July 20, 2019
स्पर्धा परीक्षेतील हमखास यशासाठी

महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा विश्व म्हणजे ऊन आणि पावसाचा खेळ झाला आहे. दुर्दम्य आशावाद आणि टोकाची निराशा एकाच वेळेस दोन्ही स्पर्धा परीक्षा विश्वातील उमेदवार अनुभवत आहे.
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने संपूर्ण शिक्षण व्यवस्था ताब्यात घेतलेली असताना स्पर्धा परीक्षा एकच विश्व असे आहे जे विद्यार्थ्यांना पैसा आणि वशिल्याच्या शिवाय समाजाच्या मुख्य प्रवाहात आणू शकते.
परंतु सध्याच्या वातावरणात प्रचंड अस्थिरता स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी अनुभवताहेत. लाखोच्या संख्येने असणारे विद्यार्थी आणि दिवसेंदिवस कमी होत जाणाऱ्या नोकऱ्या यांचे समीकरण काही केल्या बसत नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पैसा आणि इंग्रजीची भीती या दोन गोष्टी स्पर्धा परीक्षा शिवाय असणाऱ्या संधींची दरवाजे उघडू देत नाहीत अशा दुहेरी कात्रीत अडकलेला स्पर्धा परीक्षांचा विद्यार्थी सध्या प्रचंड दडपणाखाली जगत आहे परंतु ही स्पर्धा परीक्षा विश्वाची एक बाजू असली तरी दुसरी बाजू सुद्धा समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे आज स्पर्धा परीक्षा विश्वातील विद्यार्थ्यांना पारंपारिक एक किंवा दोनच परीक्षांच्या तयारी शिवाय राज्य आणि देश पातळीवरील उपलब्ध वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करणे क्रमप्राप्त आहे.
यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगा शिवाय Staff सिलेक्शन कमिशन, बँकिंग सेक्टर, Defence सेक्टर (CAPF, CDS etc.) ज्यामध्ये अनेक वर्ग-1 व वर्ग-2 वर्ग तीन आणि चार च्या सुद्धा हजारो जागा उपलब्ध आहेत. या सर्वांच्या तयारीला विद्यार्थ्यांनी सुरुवात केली पाहिजे. याशिवाय पुढील काही गोष्टी स्पर्धा परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांनी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत.
1) स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी वयाच्या शक्य तेवढ्या लवकर हा पर्याय निवडून व्यावसायिक पद्धतीने तयारी केली पाहिजे. याचा अर्थ प्रत्येकाने क्लासच लावला पाहिजे असे अजिबात होत नाही. परंतु प्रत्येक विद्यार्थी व्यावसायिक पद्धतीने तयारी करू शकतो. पैशाशिवाय अशी तयारी करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत ज्ञानज्योती फ्री लर्निंग युनिव्हर्सिटी हा असाच एक उपक्रम आहे.
2) स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला तयारीसाठी चा कालावधी आधीच निश्चित करून ही कालमर्यादा कुठल्याही परिस्थितीत पाळली पाहिजे वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेच्या तयारी मध्ये घालण्यापेक्षा ठराविक कालमर्यादेच्या बंधनात राहून स्पर्धापरीक्षेची तयारी करणे अधिक फायद्याचे आहे. हे कसे साध्य करावयाचे ते योग्य नियोजन आणि मार्गदर्शकाच्या मदतीने ठरवावे.
3) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयारी सोबतच कौशल्य विकासाचे काही कार्यक्रम पूर्ण करून व्यावहारिक जगामध्ये सक्षम करिअरचा पर्याय उभा करून ठेवला पाहिजे.
4) स्पर्धा परिक्षांचे जग हे बेभरवशाचे आहे हे खरे असले तरी लेखामध्ये वर उल्लेख केलेल्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या एकत्रित तयारीने आणि वरील तीन मुद्द्यांच्या अनुषंगाने तयारी केली असता शंभर टक्के यशाची खात्री उमेदवार स्वतःच स्वतःला देऊ शकतो. चमकते ते सगळेच सोने नसते. जाहिरातींच्या आधारावर यशाचे खोटे वलय उभे करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पासून स्वतःला वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःची बुद्धी वापरली पाहिजे.
विशाल भेदुरकर
वित्त आणि लेखा अधिकारी पुणे
iasvishalbhedurkar@gmail.com | 9975806127