January 30, 2020
कोरोना व्हायरस भारतात दाखल, केरळमध्ये आढळला पहिला रुग्ण

– कोरोना विषाणुने जगभरात थैमान घातले असून आता त्याने भारतातही शिरकाव केला आहे. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. केरळमध्ये हा रुग्ण आढळला असून तरुण चीनमधील हुआन विद्यापीठात शिक्षण घेत होता. तपासणी केली असता तरुण पॉझिटिव्ह आढळला असून त्याला रग्णालयात डॉक्टरांच्या देखेरेखेखाली ठेवण्यात आलं आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
– कोरोना व्हायरसची साथ पसरण्यामध्ये चीनमधील हुबेई प्रांताची राजधानी हुआन मुख्य केंद्र आहे. हा व्हायरस आता जगात अनेक ठिकाणी पसरला आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील १७० जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून हुबेई प्रांतातील ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. व्हायरस वेगाने पसरू लागल्यानंतर भारतीय सरकारने हुआन येथे असणाऱ्या २५० भारतीयांना मायदेशी आणण्याचा निर्णय घेतला. दरम्यान चीनमधून परतणाऱ्या सर्व भारतीयांची विमानतळावर तपासणी केली जात आहे.
चीनमध्ये अडकले महाराष्ट्रातील सात विद्यार्थी
चीनमध्ये २७ भारतीय अडकले असून यामध्ये महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश आहे. हे विद्यार्थी पुणे, पिंपरी चिंचवड, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेडमधील येथील आहेत. ही मुलं युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजीमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेत आहेत.
मुंबईत ४, पुण्यात २ संशयित रुग्णांवर सरकारी रुग्णालयात उपचार
या जीवघेण्या विषाणूने होणाऱ्या आजाराची लक्षणं असलेले ४ संशयित मुंबईत आढळून आले असून त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पुण्यातही २ संशयित आढळून आले असून त्यांच्यावर नायडू हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
कोरोनामुळे नेमकं काय होतं?
– कोरोना विषाणूने सर्दीपासून श्वसनाच्या गंभीर आजारापर्यंत समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
– या विषाणूच्या संसर्गाने ताप, कफ, श्वसनात अडथळे अशी लक्षणे दिसत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.
– चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ४४० जणांना या विषाणूची लागण झाली असून त्यांच्यात न्यूमोनियाची लक्षणे दिसत आहेत.
– आतापर्यंत मध्य चीनमधील हुबेई प्रांतात नऊ बळी या विषाणूने घेतले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे उपसंचालक ली बिन यांनी दिली आहे.
काय आहे कोरोना व्हायरस? कशी घ्याल काळजी
– कोरोनाव्हायरस सार्स’ मध्ये (SARS) जागतिक साथीचा रोग म्हणून आधीच ओळखले गेले आहे, ज्यामुळे आठ हजार लोकांपेक्षा जास्त प्रमाणात जगभरात मोठ्या प्रमाणात बाधीत रुग्ण आढळले.
– सध्याच्या माहितीनुसार, जलचर जीव अशा प्रकारचे विषाणू संक्रमित करण्याचे ज्ञात नाही, म्हणूनच सीफूडपासून हा वायरस उद्भवण्याची शक्यता नाही. संक्रमित व्यक्तींमध्ये, मानवी संक्रमणाची ओळख पटली गेली आहे. सर्वांत प्रभावित होणारा महत्त्वाचा अवयवाचा सहभाग म्हणजे फुफ्फुसांचा आणि त्यानंतर आतडे.
– पारंपारिकपणे हे संक्रमण अशा लोकांवर परिणाम करतात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी आहे, तरीही हे संक्रमण आजार नसलेल्या तरुण व्यक्तींवर देखील परिणाम करीत आहे. तरीही आतापर्यंत यावर, कोणतेही अँटिबायोटिक किंवा लस उपलब्ध नाही, म्हणूनच उपचार पूर्णपणे नैसर्गिक आधारावर केले जात आहेत.
– संसर्गजन्य रोगांच्या पहिल्या तत्त्वांमध्ये, सर्वात वाईट बग्स मानवी संपर्काचे चक्र तोडून किंवा निर्जंतुकीच्या स्थितीत संपर्क राखून असतात. जर तुम्हाला असे वाटत असेल की आपल्याला एखाद्या संसर्गाची सुरूवात झाली आहे, तर तुम्ही डॉक्टरांना किंवा जवळच्या रुग्णालयात जाऊन भेट देणे गरजेचे आहे. निदान होईपर्यंत किंवा लक्षणांचे निराकरण होईपर्यंत स्वत: ला इतरांपासून दूर ठेवा. प्रभावित क्षेत्रांचा प्रवास करणे किंवा त्या भागातील लोकांशी संपर्क साधणे केवळ सरकारी सल्लामसलत किंवा तपासल्यानंतरच करावे.